अहमदनगर : १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत पोलिसांनी बालके, महिला व पुरूष अशा एक हजार ८८ जणांचा शोध घेतला आहे. रेकॉर्डवर नसलेल्या ४७ बालके मिळून आली असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक IPS मनोज पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. ही मोहिम पुढील २६ जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यामध्ये ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली. यासंदर्भात केलेल्या कामगिरीची माहिती अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. बालकांचे अपहरण केल्याचे जिल्ह्यात २०० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ७७ बालकांचा ऑपरेशन मुस्कान मोहिमेत शोध घेण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एक हजार २१० महिलांपैकी ६२१ व एक हजार ९१ पुरूषांपैकी ३९० जणांचा शोध घेण्यात आला. पोलिसांची मोहिम सुरू असताना नगर शहर व जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड बाहेरील ४७ मुले पोलिसांना मिळून आली. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे अधीक्षक IPS मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेसाठी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस कर्मचारी एस. बी. कांबळे, ए. आर. काळे, आर. एस. म्हस्के, एस. के. घुटे, आर. एम. लोहाळे, छाया रांधवन यांनी काम केले. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.